आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य
कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुंबई : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे, तसेच अनुदानित व शासकीय आश्रमशाळांमधील गैरसोयींची त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी ऑडिट) पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली.
पुणे, नाशिक आणि नागपूर येथील आदिवासी विद्यार्थी गेल्या १७ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुण्यातील कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.
भरती प्रक्रियेलाही गती
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत विभागाचे अधिकारी, आंदोलनकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. बैठकीत बिंदुनामावली आणि पैसा क्षेत्रातील भरती, तसेच आश्रमशाळांमधील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
आतापर्यंत नऊ संवर्गांची भरती पूर्ण झाली असून उर्वरित सहा संवर्गांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. अधिसंख्य पदांबाबतही तीन महिन्यांच्या आत संख्या निश्चित करून पुढील सहा महिन्यांत त्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्र्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य
बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आश्रमशाळांशी संबंधित प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आंदोलनकर्त्यांनी पुणे येथे सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आमदार रोहित पवार यांचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
