के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्याकडून ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर जळगाव – के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२वी (विज्ञान शाखा) विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच झालेल्या भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी आयुष भामरेला ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर करून त्याचा गौरव केला.
प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे म्हणाले, “आयुष भामरेने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश आमच्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेसारख्या समृद्ध विषयात आजच्या तरुण पिढीकडून एवढ्या उत्कटतेने सहभाग होत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी बाब आहे.“स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय हे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक आणि पारंपरिक ज्ञानाच्या संवर्धनातही अग्रस्थानी राहिले आहे. आयुषसारख्या विद्यार्थ्यांमुळे संस्कृत विषयाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. आमच्या संस्थेचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूल्य, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा रुजवणे हा आहे. आयुषने १०० पैकी १०० गुण मिळवत हे सिद्ध केले की पारंपरिक विषयातही उत्कृष्टतेचे शिखर गाठता येते. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच केसीई च्या वतीने त्याला ₹५०००/- चा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. हे यश त्याच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देईल आणि आमच्या संस्थेचा गौरव अधिक वृद्धिंगत करेल.” ही स्पर्धा केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या वतीने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आली होती.
देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वेद, उपनिषद, शास्त्र, भारतीय
गणित आणि सांस्कृतिक परंपरा या विषयांवरील आव्हानात्मक प्रश्नपत्रिकेत आयुषने १०० पैकी १०० गुण मिळवत आपल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली. दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी जयपूर येथे झालेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात, आयुषचा राष्ट्रीय विजेत्या म्हणून गौरव करण्यात आला. या भव्य सोहळ्यात त्याला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹५०००/- चे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. आर.बी. ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील, संस्कृताध्यापक प्रा. अर्जुनशास्त्री मेटे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीवर्गाने आयुषचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. भारंबे म्हणाले, “आयुषचे हे यश संस्थेतील संस्कृत अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरेल. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर नेण्यासाठी आमचे विद्यार्थी कटिबद्ध आहेत.”
